बदलत्या परस्थितीत युवकांनी कौशल्यपूर्ण असणे आवश्यक
– जिल्हाधिकारी
वर्धा :- कोविड 19 महामारीमुळे जगाची अर्थव्यवस्था बदलली आहे. अशा परिस्थितीत जे रोजगार उपल्सब्ध होऊ शकतात त्याच्या अनुषंगाने आपले कौशल्य विकसित करण्याची गरज आहे. मार्केटच्या गरजेप्रमाणे स्वतः कौशल्यपूर्ण असणे महत्त्वाचे असल्याचे प्रतीपादन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त केले.
जिल्हा कौशल्य रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने सावंगी मेघे रुग्णालयात जागतिक युवा कौशल्य दिन आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होत्या. या कार्यक्रमाला विनोबा भावे रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी अभ्युदय मेघे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, जिल्हा रोजगार व कौशल्य मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे उपस्थित होत्या.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाल्या तरुण मुलांचं ऐकुन शासन ,प्रशासनाने काम करणे अपेक्षित आहे. त्यामुळे तरुणांसाठी काय आवश्यक त्यानुसार आपले धोरण ठरवावे लागेल. सध्याच्या परिस्थितीत नोकर्या आहेत ओण आपल्या तरुणांना त्याची माहिती नाही आणि ज्या नोक-या किंवा रोजगार उपलब्ध आहेत त्यासाठीचे कौशल्य आपल्याकडे नसल्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढते आहे. खाजगी क्षेत्रात अमर्याद संधी आहेत. त्यामुळे तरुणांनी तशी कौशल्ये विकसित करावी.
कोविड काळात प्रशिक्षित मनुष्यबळाची अतिशय कमतरता होती. त्यामुळेच पुन्हा तिसऱ्या लाटेसाठी कुशल मनुष्यबळ , तंत्रज्ञ तयार करण्यायासाठी मुख्यमंत्र्यांनी महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला. या माध्यमातून जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 300 युवकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे प्रशिक्षण चांगल्या प्रकारे पूर्ण करावे असे आव्हान त्यांनी केले. पुढच्या काळात कशाची आवश्यकता आहे त्याप्रमाणे आपण ट्रेनिंग देण्याचे नियोजन करू युवकांनी त्याप्रमाणे तयारी करावी असेही जिल्हाधिकारी म्हणाल्या.
यावेळी बोलताना अभ्युदय मेघे यांनी आपले ज्ञान व कौशल्य हे उद्योगांमध्ये नोकरी मिळण्यासाठी किंवा स्वतः रोजगार उभारून स्वतःची उपजिविका निर्माण करण्याइतपत विकसित करण्याची गरज असल्याचे सांगितले. सावंगी मेघे रुग्णालयात वैद्यकीय क्षेत्रात उपयुक्त ठरणारे 29 अलाईड कोर्सेस सुरू केले आहेत. विदर्भातील हे एकमेव कॉलेज आहे. या कोर्सेसमुळे उपलब्ध होणाऱ्या मनुष्यबळाचा लाभ डॉक्टरचा वेळ वाचविण्यासाठी होऊन रुग्णांना ते जास्त वेळ देऊ शकतील असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्रास्ताविक भाग्यश्री वाघमारे यांनी केले तर सूत्र संचालन धीरज मनवर, आभार रुपसिंग ठाकूर यांनी व्यक्त केले.