लाखनी :
कोविडमुक्त क्षेत्रांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संमतीने इयत्ता आठवी ते बारावी चे वर्ग सुरू करण्यासंबंधीने शिक्षण विभागाने १५ जुलै रोजी निर्णय जारी केला होता. मात्र अवघ्या काही तासांतच सदर शासन निर्णय शासनाच्या संकेतस्थळावरून मागे घेण्यात आल्याने शाळा सुरू होण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत असलेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा हिरमोड झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यातून समन्वयाअभावी शालेय शिक्षण विभागाचा गलथापणा उघडकीस आला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १५ एप्रिल पासून राज्यात लाकडाऊन जाहीर केले. त्यानंतर जूनपासून राज्यात निर्बंध शिथिल करण्यात आले. मागील वर्षी शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. माध्यमिक शिक्षण संचालनालयाने विदर्भात २८ जून तर राज्य ाच्या इतर ठिकाणी १४ जून २०२१ रोजी शैक्षणिक सत्र ऑनलाइन सुरू करण्याचे निर्देश दिले .कोरोनाची लाट मोठ्या प्रमाणावर ओसरल्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाचा लाभ व्हावा यासाठी कोरोनामुक्त क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठरावाने राज्यातील इयत्ता आठवी ते बारावी चे वर्ग सुरू करण्याचा शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ५ जुलै २०२१ रोजी निर्णय घेतला. सदर शासन निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर जाहीर केला. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र रात्री उशिरा संकेतस्थळावरून शासन निर्णय अचानक हटविण्यात आल्याने विद्यार्थी , पालक व शाळांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला असून विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे चित्र दिसून येत आहे. सदर प्रकारावरून कोरोना काळात गेल्या दीड वर्षांपासून शिक्षण विभागाचा समन्वयाच्या अभावामुळे वारंवार गलथापणा दिसून येत आहे .
*लहान मुलांना कोरोना संसर्गाचा धोका नाही?
एकीकडे पाच जुलै रोजी जारी केलेल्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयात सध्या दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कोरोना संसर्ग होण्याची सर्वात कमी शक्यता असून अठरा वर्षांपर्यंतच्या मुलांना सध्यातरी संसर्ग होण्याची शक्यता कमी आहे असे नमूद करण्यात आले आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेमध्ये लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याची शक्यता आरोग्य विभागाने यापूर्वीच वर्तविली आहे.