सेलू :
गेल्या दोन वर्षापासून वर्धा डेपोतील आगारप्रमुख यांना अनेकदा विनंती निवेदने देऊन सुद्धा, एसटी चालक व वाहक यांच्या मनमर्जी कारभाराने केळझर गावातून एसटी बस जात नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना तसेच परिसरातील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आज केळझरवासी यांचा राग अनावर होऊन तब्बल दोन तास सुपर बसेसना केळंझर येथील बायपास रोडवर अडवून आंदोलन केले .
शेवटी एसटी बसेस केळझर गावांमधून प्रवेश केल्याने आंदोलन मागे घेण्याचे आले .
सेलू तालुक्यातील केळझर हे गाव माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दत्तक गाव म्हणून तसेच तीर्थक्षेत्र म्हणून संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. केळझर परिसरातील जूनगड, गायमुख, दहेगाव, वडगाव जंगली, आमगाव, खडकी, ईटाळा, इत्यादी गावातील अनेक विद्यार्थी सेलू- वर्धा – नागपूर येथे ये-जा करीत असतात. नागपूर तुळजापूर बायपास मार्ग झाल्यापासून एसटी बसेस केळझर गावाबाहेरुनच परस्पर निघून जात असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवाशांना गेल्या दोन वर्षापासून नाहक त्रास सहन करावा लागत आहे, अखेर नागरिकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण होऊन आज सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत केळझरच्या सरपंच अर्चना लोणकर, ग्रामपंचायत सदस्य फारुख शेख, अशोक चौधरी, अमोल घवघवे, संजय मेश्राम, हितेश नखाते, अरुण लोणकर, सदानंद बर्डे, सागर पाटील, कृष्णा वाकडे, सुधाकर मेश्राम, तसेच असंख्य विद्यार्थी परिसरातील नागरिक यांनी एसटी बस चक्काजाम आंदोलन करीत वर्धा नागपूर – यवतमाळ डेपोतील बसेसना केळझर गावातून प्रवेश करण्याकरिता भाग पाडले.
Box
केळझर येथील सुनिता नर्सिंग स्कूल जवळील बायपास रोडवर नागरिक विद्यार्थ्यांची आंदोलन केल्याने एसटी बसेसची गर्दी जमली होती. वर्ध्याचे उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे नागपूर कडे जात असताना त्यांनासुद्धा आंदोलनाचा फटका सहन करावा लागला जवळपास एक तास त्यांना थांबावे लागले. यावेळी सेलू पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील गाडे यांनी मध्यस्थी केल्याने बसेस चालक-वाहकांना केळझर गावामध्ये थांबा देण्यासंबंधीचे सक्त आदेश देऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली.