• मोर्च्यात शेतकऱ्यांसह महिलांचाही समावेश
लाखनी :-
मुरमाडी/तूप परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात लागवड केलेल्या गळीताचे धान्य , तृणधान्य व कडधान्य तथा भाजीपाला जन्य पीक घेणाऱ्या आणि उन्हाळी धानाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या वीज विषयक समस्यांच्या सोडवणुकीकरिता उपकार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी तथा तहसीलदार लाखनी कार्यालयावर मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

मुरमाडी/तूप परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांना शेतीपंपाला नियमित ८ तास विद्युत पुरवठा करण्यात यावा. वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना कोणतीही पूर्व सूचना न देता बंद केलेले विद्युत जनित्र पूर्ववत सुरू करावे. कृषी पंपाला लावलेले मीटर रीडिंग न घेता पाठविण्यात आलेली देयके रद्द करून सुधारित देयके पाठविण्यात यावे. बंद असलेला विद्युत मीटर शेतकरी ग्राहकांनी अनेकदा अर्ज करून नवीन मीटर न लावल्याबाबद डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना त्वरित वीज जोडणी देण्यात यावी. तथा वीज बिलावरील सबसिडी ३१ मार्च ऐवजी ३१ जून २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. या मागण्यांकरिता मुरमाडी परिसरातील शेतकऱ्यांनी मोर्च्याचे आयोजन केले होते. हा मोर्चा समर्थ क्रीडांगणावरून निघून तहसील कार्यालयावर नेण्यात आला. तिथे निवेदन देऊन उपकार्यकारी अभियंता कार्यालयावर नेण्यात आला. उपकार्यकारी अभियंता राजन लिमजे यांच्याशी समस्यांबाबद चर्चा करून निवेदन देण्यात आले. या मोर्च्यात शेकडो शेतकऱ्यांसह महिलाही समाविष्ट झाल्या होत्या. चर्चेनंतर जिल्हा परिषद सदस्य गणेश निरगुळे , पंचायत समिती सदस्य सुरेश झंझाड, माजी जि. प. सदस्य आकाश कोरे , पळसगाव चे सरपंच विलास सार्वे , माजी सरपंच शालीक शिवणकर , सामाजिक कार्यकर्ता शेषराव शिवणकर , संजय हेमने , पिंटू बावकुळे, पतिराम जवंजार , किशोर चेटूले यांचा शिष्टमंडळात समाविष्ट होता.