Saturday, July 27, 2024
Homeभंडाराझेडपी शाळेच्या रँचोंनी बनविली सायकलरिक्षा

झेडपी शाळेच्या रँचोंनी बनविली सायकलरिक्षा

अडगळीतल्या साहित्याचा वापर : कोरोना काळाचा केला सदुपयोग

विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्क
लाखनी / पालांदुर : अडगळीत पडलेल्या वस्तू एकत्र करीत, त्यातून सायकलरिक्षा आणि बैलगाडी तयार करण्यात आली. हा सर्व खटाटोप शहरातील विद्यार्थ्यांनी नाही तर, तंत्रज्ञानाचा दूरवर गंध नसलेल्या जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला आहे. यावर विश्वास जरी बसणार नसला तरी, हे सत्य आहे.


तालुकास्तरापासून अगदी आडमार्गावर असलेल्या मिरेगाव व मुरामाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही कलाकुसर करून ग्रामस्थांना आश्चर्यचकित केले आहे. टाकाऊ वस्तुतून टिकाऊ वस्तू तयार करण्याच्या कल्पक बुद्धीने प्रेरित झालेल्या विद्यार्थ्यांनी सायकलरिक्षा व बैलबंडी तयार करून कल्पक बुद्धीमत्तेची चुणूक दाखविली. कल्पक बुद्धिमत्तेचे धनी ठरलेले विद्यार्थी परिसरात कौतुकाचे मानकरी ठरले आहे.
कोरोना संकटाने सर्वांनाच संकटात ओढलेले आहे. या संकटात मागील आठ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. मात्र, हे रँचो कोरोनाला न घाबरता घरात न बसता खुल्या रानावनात आणि गावातील मोकळ्या जागेत काहीतरी नवीन करण्याच्या उद्देशाने भटकंती करीत होते.ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था आजही ८० टक्केच्यावर शेतीवर अवलंबून आहे. घरातली मंडळी शेतीच्या कामात व्यस्त असतात. त्यामुळे मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ अपुरा असतो. एखादा कारखाना किंवा एखादे यंत्र तयार करण्यासाठी जशी अभियांत्रीकी शाळेतील अभियंते एकत्रित येत कलागुणांचा योग्य वापर करून अपेक्षित असलेले यंत्र बनवितात. अगदी तसंच ग्रामीण भागातील विद्यार्थीसुद्धा या कोरोनाच्या संकटकाळात आपली कल्पक बुद्धी वापरून आई-वडिलांना शेतीत उपयोगात असलेली साहित्य बनवीत इतरांना नवलात टाकले आहे. त्यांना भविष्यात योग्य मार्गदर्शन लाभल्यास निश्चितच त्यांच्या बुद्ध्यांकात वाढ होईल.

चौकट
हे आहेत बालवैज्ञानिक
इयत्ता पाचवीत शिकणारा हिमांशू भेंडारकर, लोकेश भेंडारकर, सहाव्या वर्गातील सुरेश मेश्राम, इयत्ता सातवीचा श्रेयश भेंडारकर, ज्ञानेश्वर भेंडारकर, निखिल तरोने, इयत्ता आठवीचा रोहित कोडवते आणि निखिल मुनेश्वर या आठ विद्यार्थ्यांनी बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून सायकलरीक्षा आणि बैलगाडी तयार केली.

चौकट
टाकाऊपासून टिकाऊ
सोनमाळा व धानला येथील विद्यार्थ्यांनी सायकल व बैलगाडी बनविताना घरातलीच जुनाट असलेली निरुपयोगी ठरलेले साहित्य यासाठी वापरले. कल्पक बुद्धीचा योग्य तो वापर करून शेती उपयोगी साहित्य तयार केले. यासाठी जुन्या सायकलचे दोन चाक, आरसा, बांबूचे दोन राळ, त्यात पुढे चाक व हँडल असा साहित्यांचा मेळ करून सायकलरिक्षा तयार केली.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular