वर्धा :- युध्दात अथवा युध्दजन्य परिस्थितीत किंवा कोणत्याही लष्करी कारवाईत विरमरण आलेल्या महाराष्ट्राचा रहिवासी असलेल्या भारतीय सैन्य दलातील जवान किंवा अधिकारी यांच्या विधवा पत्नी किंवा त्यांच्या वारसांना जमिन देण्याचे प्रयोजन आहे.
त्यानुसार 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी वर्धा जिल्हयातील शहिद गनर येथील अमित टिपले यांची पत्नी नलिनी टिपले व शहिद शिपाई हरी लाखे यांच्या वारसदार वीरमाता सिताबाई लाखे यांना पालकमंत्री तथा राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांचे हस्ते जमिनीचे पट्टे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र शासन राजपत्र 28 जुन 2018 तसेच महाराष्ट्र जमिन महसूल ( सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे) नियम 1971 चे नियम 11 (अ) नुसार जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. सदर नियमाअंतर्गत शहिद अमित टिपले यांच्या वारसदार नलिनी टिपले यांनी महसूल जमिन मिळण्याबाबत अर्ज सादर केल्यामुळे सेलू तालुक्यातील मौजा इटाळा येथील नागपूर समृध्दी महामार्गाच्या दक्षिणेकडील मध्यभागातील क्षेत्रापैकी शेत सर्वे क्र. 7 मधील 2.00 हेक्टर आर ही जमिन तसेच शहिद हरी लाखे यांच्या वारसदार सिताबाई लाखे यांना कोंटबा येथील सर्वे क्र. 210 मधील नागपूर समृध्दी महामार्गाच्या उत्तरेकडील भागाच्या क्षेत्रापैकी 2 हेक्टर आर जमिनीच्या पट्याचे वाटप करण्यात आले.