अद्यावतीकरणामुळे नागरिकांना तात्काळ मदत मिळेल
-सुनील केदार
वर्धा :- पोलिस विभागातील नियंत्रण कक्षात स्थापन असलेला 'डायल 100' क्रमांकाच्या यंत्रणेचे अद्यावतीकरण केल्यामुळे नागरिकांना कायदा व सुव्यस्थेबाबत आवश्यक पोलिस मदत तात्काळ उपलब्ध होऊन अडचणीत सापडलेल्या लोकांना लवकर दिलासा मिळेल,असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केले.
जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात सेफ सिटी प्रकल्पातंर्गत स्थापित फास्ट रिस्पॉन्स सिस्टमचे आज मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, जिल्हा पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत सोळंके, पोलिस उप अधिक्षक (गृह) संतोष खांडेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी पियुश जगताप, तृप्ती जाधव, दिनेश कदम यांची उपस्थिती होती.
पूर्वी 100 क्रमांकावर संदेश आल्यावर त्यात क्रास कनेक्शन, फोन वेटींग, आवाजात खरखर, इत्यादी अडचणी येत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. विशेष करुन महिला, बालक, वरीष्ठ नागरिक व संकटात सापडलेल्या व्यक्तींना उशिरा मदत मिळण्याची शक्यता मोठी होती. ही अडचण लक्षात घेऊन 100 क्रमांकाची यंत्रणा अद्यावत करण्यासाठी खनिज विकास मधून निधी उपलब्ध करून दिला. आता 100 क्रमांकावर संदेश आल्यावर संबधीत पोलिस मोबाईल वाहन व पोलिस ठाणे यांना जलद गतीने निरोप देऊन तात्काळ नागरिकांना पोलिस मदत उपलब्ध होईल असे श्री केदार यावेळी म्हणाले.
यावेळी पोलीस अधीक्षक व या यंत्रणेचे काम सांभाळणाऱ्या पोलीस कर्मचाऱयांनी अद्यावत यंत्रणेची माहिती दिली. नागरिकांनी पोलिस विभागांना दिलेली माहिती साठवून ठेवण्याची सुविधा पुवी 100 क्रमांकावर नव्हती. आता ही सुविधा यामध्ये उपलब्ध असल्यामुळे साठविलेल्या माहितीचे पोलिस विभागाला अवलोकन करुन त्याबाबत आवश्यक सुधारणा व उपाययोजना करणे शक्य होणार आहे. यासाठी पोलिस विभागाच्या वाहनावर जीपीएस प्रणालीचा उपयोग करण्यात आला असून वाहनाच्या हालचालीवर नियंत्रण ठेऊन त्यांना आवश्यक मदत पुरविणे सुद्धा शक्य होणार आहे, असे श्री होळकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाला पोलिस निरिक्षक निलेश ब्राम्हणे, चंद्रशेखर चकाटे, विजय महेशगवरी व पोलिस विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती