वर्धा : कोरोनाच्या प्रादूर्भावानंतर प्रदीर्घ काळानंतर टप्याटप्याने वर्ग 5 ते 12 विच्या शाळा आता नियमितपणे सुरू झालेल्या आहे. आपल्या जिल्ह्यात बहुतांश शाळेत शिकणारे विदयार्थी हे ग्रामीण भागातील असल्यामुळे बसेसच्या अनियमित फेऱ्यामुळे ते दररोज शाळेत येऊ शकत नाही तसेच आर्थीक परिस्थिती हलाकीची असल्यामुळे दररोज खाजगी वाहनाने पैसे देऊन शाळेत येणे त्यांना न परवडणारे आहे.
त्यामुळे या सर्व विदयार्थ्यांचे फार मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. एप्रिल महिण्यापासून वर्ग 12 वि व वर्ग 10 वीची बोर्डाची परीक्षा होऊ घातली आहे. या दोन्ही परीक्षा विदयार्थ्यांच्या पुढील भविष्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाच्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील बसेसनी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे बसेस अभावी शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पूर्वीप्रमाणे सुरू असणाऱ्या सर्व बस फेऱ्या नियमितपणे सुरू करा या मागणीचे लेखी निवेदन शुक्रवार दि.12 फेब्रुवारी 2021 ला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा वर्धा तर्फे जिल्हाध्यक्ष राजू चंदणखेडे यांचे मार्गदर्शनात आगार व्यवस्थापक मा. श्रीमती चौकट यांना देण्यात आले. यावेळी त्यांनी शाळांच्या मागणी नुसार व शाळांच्या वेळेनुसार ग्रामीण भागातील सर्व बसेस तात्काळ सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच सावित्रीबाई फुले विद्यालय, मासोद या शाळेच्या मागणी नुसार वर्धा सुसुंद बस सोमवार दि. 15 फेब्रुवारी पासून नियमीतपणे सुरू करण्याचे त्यांनी मान्य केले. यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष जयप्रकाश थोटे, विमाशीचे कार्यकारी अध्यक्ष पांडुरंगजी भालशंकर, कार्यवाह महेंद्र सालंकार, खाजगी प्राथमिक शिक्षक संघाचे सचिव सुरेशकुमार बरे, विमाशीचे उपाध्यक्ष सुनिल धवने, कोषाध्यक्ष शशांक हुलके, रामदास लाकडे, विमाशीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रमोद खोडे उपस्थित होते.