Ø पालकमंत्र्यांनी घेतला आर्वी, आष्टी व कारंजा रुग्णालयाचा आढावा
Ø रुग्ण वाहिकेचे लोकार्पण
वर्धा, :- रुग्णालयात येणा-या प्रत्येक रुग्णांवर चांगल्या पध्दतीचा उपचार करण्यासाठी औषधीची कमतरता असल्यास तात्काळ मागणी नोंदवा. तसेच रुग्णालयात 50 बेडची वाढ करण्याच्या सूचना राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुनिल केदार यांनी दिल्यात. आर्वी उपजिल्हा रुग्णालय तसेच आष्टी व कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयाचा कोविड संदर्भात आढावा घेताना ते बोलत होते.
बैठकिला उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक,माजी आमदार अमर काळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन तडस, वैद्यकिय अधिक्षक डॉ. एम.एस. सुटे, तहसिलदार विद्याधर चव्हाण, नगर परिषदचे मुख्याधिकारी उपस्थित होते. तर आष्टी येथे वैद्यकिय अधिकारी डॉ. अरशिया शेख, तहसिलदार आशिष वानखेडे, नायब तहसिलदार राम कांबळे, मुख्याधिकारी मनोजकुमार शहा व कारंजा येथे डॉ. वंजारी यांची उपस्थिती होती.
यावेळी सुनिल केदार यांनी आर्वी व कारंजा येथे कोरोना बाधिताचा रिकव्हरी दर चांगला असल्याबाबत समाधान व्यक्त केले. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे लसीकरण असून लस घेण्यासाठी प्रत्येक 18 वर्षावरील सर्व नागरिकांना प्रवृत्त करावे. यासाठी आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांनी लोकप्रतिनिधी सोबतच मिडियाचे सहकार्य घेऊन काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आरोग्य कल्याण समित्या स्थापन न केलेल्या रुग्णालयांनी आरोग्य कल्याण समित्या स्थापन कराव्यात. तसेच रुग्णालयात रिक्त असलेला कर्मचा-यांचे पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे श्री केदार यांनी सांगितले.
यावेळी आष्टी येथील नविन रुग्णावाहिकेचे लोकार्पण पालकमंत्री सुनिल केदार यांचे हस्ते करण्यात आले.