स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघटनेची मागणी
जिल्हाधिका-यांना दिले निवेदन
वर्धा : आरोग्य विभागाने 28 फेब्रुवारीला घेण्यात आलेल्या परीक्षेत अनेक केंद्रात गैरप्रकार झाला आहे. या गैरप्रकाराची चौकशी करून पुन्हा परीक्षा घेण्यात यावी. अन्यथा राज्य शासनाच्या सरळेसेवेच्या सर्व परीक्षा एमपीएससीमार्फत घेण्यात याव्या, अशी मागणी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मागील 3 ते 4 वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी विद्यार्थी करीत आहे. शासनाने मागील 3 वर्षांपासून कोणतेही स्पर्धा परीक्षा घेतली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास करूनसुद्धा भ्रमनिराश होत आहे. त्यात आरोग्य विभागाच्या जागा भरण्यासाठी 28 फेब्रुवारी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत अनेक ठिकाणी गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी अनेक विद्यार्थ्यांनी केल्या आहे. यात ब-याच परीक्षा केंदावर पेपर एक तास उशीरा सुरू करण्यात आला. काही केंद्रावर पेपरचे अगोदरच सील फुटलेले आढळले. तर काही परीक्षा केंद्रावर मुले ऑनलाईन पद्धतीने मोबाईल कालवर प्रश्नाचे उत्तर विचारतांना पकडल्या गेले. काही केंद्रांवर 2 ते 3 परीक्षार्थी बसविण्यात आले. ज्यामुळे मास्क काॅपीला चालना मिळाली. तर काही ठिकाणी रोल नंबर सुद्धा टाकण्यात आले नव्हते. ऐनवेळी परीक्षा केंद्र बनविण्यात आले त्यामुळे विद्यार्थ्यांची धावपळ झाली. ब-याच विद्यार्थ्यांनी अनेक वेगवेगळ्या पदासाठी नोंदणी केली होती, पण ही परीक्षा एकाच दिवशी घेण्यात आली व त्या वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळे परीक्षा केंद्र देण्यात आले. या कारणाने अनेक विद्यार्थ्यांना केवळ एकच पेपर देता आला त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले.
गावाच्या जवळ परीक्षा केंद्राचा प्राध्यानक्रम विद्यार्थ्यांने निवडला असतानाही त्यांना प्रचंड दूरचे परीक्षा केंद्र देण्यात आले. महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीने सरकारने ही पहिलीच भरती प्रक्रिया राबविली व ती सुद्धा पूर्ण नियोजन शून्य होती. कोणत्याही परीक्षेची प्रक्रिया ही पादर्शक व्हावी व विद्यार्थ्यांचा विश्वास स्पर्धा परीक्षेवर टिकून रहावा. यासाठी परीक्षेमध्ये जो सावळा गोंधळ झाला त्याची प्रशासनाने निःपक्षपातीपणे चौकशी करावी, अन्यथा ईमानदाराने अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. महाराष्ट्र शासनाने या प्रकरणाची पुर्णतः चौकशी करून पुन्हा परीक्षा घाव्या अन्यथा राज्य शासनाच्या सरळसेवेच्या सर्व परीक्षा एमपीएससीमार्फत घेण्यात याव्या, आदी मागण्या करण्यात आल्या.
निवेदन देतेवेळी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.