भंडारा :
देशाच्या स्वातंत्र्याला 74 वर्ष पूर्ण होऊन 15 ऑगस्ट 2021 रोजी आपण 75 वर्षात पदार्पण करीत आहोत. या निमित्ताने स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी काँग्रेस पक्षाने ‘व्यर्थ न हो बलिदान’ हे अभियान हाती घेतले आहे. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.नाना पटोले यांनी काँग्रेस मंत्र्यांच्या बैठकीत दिली.
मुंबई येथील टिळक भवन येथे काल काँग्रेस मंत्र्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आ.पटोले बोलत होते. यावेळी राज्यमंत्री मंडळातील बाळासाहेब थोरात, अशोकराव चव्हाण, सुनील केदार , विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, नितीन राऊत, वर्षा गायकवाड, अस्लम शेख, के.सी.पाडवी, सतेज पाटील, विश्वजीत कदम हे मंत्री तसेच प्रदेशाध्यक्ष बसवराज पाटील, प्रतिणती शिंदे, कुणाल पाटील, महाराष्ट्र सहप्रभारी आशिष दुआ, सोनल पटेल, संपतकुमार, महिला अध्यक्ष संध्या सव्वालाखे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, व विनाय देशमुख, अतुल लोंढे, देवानंद पवार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. पाटोले म्हणाले, केंद्रातील भाजपा सरकार स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाची मोडतोड करण्याचा प्रयत्न करीत आहे. तरुण पिढीसमोर खरा इतिहास जावा व त्यांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने ‘व्यर्थ न हो बलीदान’ हे अभियान सुरु करण्यात आले आहे. वर्षभर चालणारे हे अभियान यशस्वी करण्यासाठी मंत्री, पक्षाचे पदाधिकारी यांनी सक्रीय सहभाग घेऊन सहकार्य करावे.
यावेळी प्रदेश समन्वयक व सरचिटणीस अभय छाजेड यांनी या अभियानाची संकल्पना विशद केली. या अभियानाची सुरवात दि.1 ऑगस्ट रोजी पुण्यात झाली असून दि.7 ऑगस्ट फैजपूर (जळगाव), चिमठाणा (धुळे), दि.8 ऑगस्ट (नंदुरबार, नाशिक, दि.9 ऑगस्ट) क्रांतीदिन (मुंबई), दि.13 ऑगस्ट सेवाग्राम (वर्धा), दि.14 ऑगस्ट नागपूर, चिमूर दि.15 ऑगस्ट टिळक भवन, मुंबई, दि.16 ऑगस्ट औरंगाबाद व दि.17 ऑगस्ट नांदेड, असा कार्यक्रम निश्चित झाल्याचे प्रदेश सरचिटणीस व समन्वयक विनायक देशमुख यांनी सांगीतले आहे.