(प्रमोद भांडारकर)
भंडारा :-
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी एकमेक उपाय असलेल्या लसीकरण मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणाऱ्या जिल्ह्यातील सात ग्रामपंचायतचा 1 मे महाराष्ट्रदिनी पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या ग्रामपंचायतनी त्या त्या तालुक्यात 42 टक्क्यांच्यावर नागरिकांचे लसीकरण केले आहे. ‘लस’ च कोरोनाला हरविण्यासाठी रामबाण उपाय असून नागरिकांनी लस अवश्य घ्यावी व आपले जीवन सुरक्षित करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. लसीकरण मोहिमेत अन्य ग्रामपंचायतनी या ग्रामपंचायतचा आदर्श घ्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात हा सत्कार करण्यात आला. खासदार सुनिल मेंढे, आमदार अभिजीत वंजारी, राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, डॉ. माधुरी माथूरकर व सरपंच यावेळी उपस्थित होते.
भंडारा तालुक्यातील गणेशपूर, मोहाडी मधील वरठी, तुमसर मधील तामसवाडी, लाखनी मधील खराशी, पवनी मधील सावली, साकोली मधील महालगाव व लाखनी तालुक्यातील पिंपळगाव या ग्रामपंचायतचा यात समावेश आहे. सरपंच व ग्रामसेवक यांनी पालकमंत्र्यांच्या हस्ते हा सत्कार स्वीकारला. या ग्रामपंचायतनी आपआपल्या तालुक्यात लसीकरणाचे उत्कृष्ट नियोजन करुन तसेच नागरिकांना प्रोत्साहित करुन मोठ्या प्रमाणात लसीकरण करुन घेतले आहे. ग्रामपंचायतनी पुढाकार घेऊन नागरिकांना ‘लस’ घेण्यासाठी प्रोत्साहित केल्यास मोठ्या प्रमाणात लसीकरण होईल व कोरोनापासून सुरक्षितता प्राप्त होईल.
• जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी व इतरांनाही लस घेण्यासाठी सांगावे. लस हेच कोरोनापासूनचे सुरक्षा कवच आहे. त्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी लसीरकण करून घ्यावे असे आवाहन डॉ. कदम यांनी केले आहे. ग्रामपंचायतनी यासाठी पुढाकार घणे गरजेचे असून सरपंच व ग्रामसेवकांनी गावातील अधिकाअधिक नागरिकांचे लसीरकण करण्याचे नियोजन करावे. लस सुरक्षित असून त्यापासून कुठलाही धोका नाही उलटपक्षी आरोग्य व जीवन रक्षाच होणार आहे. ही बाब नागरिकांना पटवून द्यावी, असे त्यांनी सांगितले.