पालांदूर
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पालांदूर येथील सेवा सहकारी संस्था अंतर्गत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. तेव्हापासून धान खरेदीला समस्यांचा सामना करावा लागत आहे. कधी गोडाऊन समस्या तर कधी बारदाना समस्या शेतकऱ्यांच्या धान खरेदी ला अडचणीची जात आहे. गत तीन दिवसापासून बारदाना तुटवड्याने धान खरेदी बंद पडली आहे.
चुलबंद खोऱ्यात पालांदूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सर्वात मोठे धान खरेदी केंद्र म्हणून नावारूपास आलेले आहे. गोडाऊन ची समस्या आवासून उभी असताना संस्थेच्या माध्यमातून खाजगीतले गोडाऊन भाडेतत्त्वावर घेऊन शेतकरी हितार्थ धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. दोन महिन्यात सुमारे ३४००० क्विंटल धान खरेदी पार पडलेली आहे. दोन महिन्यात अजून ही माल उचलण्याचा आदेश(डीवो) न झाल्याने गोडाऊन भरलेलेच आहेत. सुरु असलेला गोडाऊन हत्या भरात पूर्ण क्षमतेने भरत आहे. त्यामुळे दोन-चार दिवसात धान उचलण्याचा आदेश न झाल्यास पुन्हां खरेदी प्रभावित होण्याची शक्यता बळावली आहे.
दरवर्षीच धान खरेदी करिता प्रशासनाकडून व्यवस्था तोकडी असते.लोकप्रतिनिधी कडून सुद्धा त्यांना सहकार्य मिळत नसल्याने यथोचित धान मोजण्याकरिता प्रशासन स्तरावरही अनेक समस्यांचा सामना अनुभवायला मिळत आहे. भंडारा जिल्ह्यातील काही तालुक्यात धान खरेदी केंद्राचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. भंडारा जिल्हा धानाच्या कोठार म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात सुपरिचित असताना शेतकऱ्याची मोजणी करता होत असलेली परवड लोकप्रतिनिधींना दिसत नसावी का? असा प्रश्न शेतकरी वर्गासह इतरही सामाजिक विचारवंतांना पडलेला आहे. नेहमी एकच प्रश्न असताना शेतकऱ्याच्या धान खरेदी केंद्राला न्याय का मिळत नाही हे सुद्धा न उलगडलेले कोडे जिल्हावासीयांना पडले आहे.
जागतिक स्तरावर विचार केला असता यावर्षी भारत देशाला निर्यातीकरिता पोषक असल्याचे ऐकण्यात आलेले आहे. निर्यातीच्या दृष्टीने सुद्धा केंद्र सरकारने सकारात्मकता शोधत धान उत्पादकांना न्याय देण्याकरिता मिळालेल्या संधीचे सोने करावे. जागतिक तांदूळ निर्यातीत भारताचा थायलँड नंतर क्रमांक लागतो. योगायोगाने भारत देशात भात पिकाचे सुमार उत्पादन झालेले आहे. निदान भंडारा जिल्ह्यात तरी सरासरीच्या दृष्टीने समाधान कारक नसले तरी काही तालुक्यात बऱ्यापैकी उत्पन्न आलेले आहे. ५० टक्के च्या आत आणेवारी असली तरी शेतकरी वर्ग खर्चाच्या नियोजनाने वर्षभर खाण्याकरिता धान ठेवून उर्वरित धान आधार केंद्राच्या आधाराने विकतो. कित्येक शेतकरी उन्हाळी हंगामाची आशा ठेवत खरिपाचा पूर्ण हंगाम आधारभूत केंद्रावर विकतो. तेव्हा भंडारा जिल्ह्यात आधार केंद्राच्या माध्यमातून झालेल्या खरेदीचे तात्काळ भात गिरण्यांना अर्थात मिलर्सना देऊन गोडाऊन मोकळे करावे. जेणेकरून उर्वरित प्रभावित झालेली धान खरेदी सुरळीत करायला मोकळी होईल.
बारदाना भवाने धान खरेदी बंद पडलेली आहे. जिल्हा मार्केटिंग कार्यालयला सूचना सुद्धा पुरविण्यात आलेली आहे. परंतु दोन दिवसात बारदाना न मिळाल्याने नाईलाजाने धान खरेदी बंद पडलेली आहे. धान मोजण्याकरिता शेतकऱ्यांचे धान कोठार परिसरात प्रतीक्षेत आहेत. बारदाना मिळेपर्यंत धान खरेदी सुरू करता येणे कठीण आहे. झालेल्या धान खरेदीचे उचलचा आदेश (डीवो) मिळणे अत्यंत आवश्यक झाले आहे.अन्यथा आज बारदाना अभावाने तर पुढे गोडाऊन संकटाने धान खरेदी बंद राहील.
विजय कापसे अध्यक्ष विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था पालांदूर.
चौकट डब्बा
पालांदूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अंतर्गत ९ नोव्हेंबरपासून धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेला आहे. यात ३० डिसेंबर पर्यंत ३३ हजार ४५३ .६० क्विंटल धान खरेदी १२११ शेतकऱ्यांची मोजणी झालेली आहे. यातील १८ डिसेंबर पर्यंत ८९३ शेतकऱ्यांचे २४ हजार ९७४ क्विंटल धानाचे चुकारे ४ करोड ६६ लक्ष ५१ हजार ४३२ रुपये जमा झालेले आहेत. ३१८ शेतकऱ्यांचे८४७९.६० क्विंटल धानाचे १,५८,३९,८९२.८० रुपये थकित आहेत. तेव्हा उर्वरित शेतकऱ्यांचे चुकारे लवकरात लवकर पाठवीत बारदान यासह डिवो ची व्यवस्था व्हावी.