भंडारा :
वनविभागाच्या हद्दीत असलेल्या परिसरात परवानगीशिवाय उत्खनन करणाऱ्या वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रार करून गावच्या सरपंच यांनी केली असतानाही त्याकडे वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. नवरगाव येथील गट क्रमांक 54 येथे दगड उत्खनन करण्यासाठी एका व्यक्तीस खणीकर्म विभागाच्यावतीने पाच वर्षासाठी परवानगी देण्यात आली.या उत्खनना सोबतच संबंधित व्यक्ती जाख येथील वनविभागाच्या हद्दीत असलेल्या पहाडी वरही उत्खनन करीत आहे. या माध्यमातून लाखो रुपयाच्या म्हासुला प्रशासन मुकत आहे.
हा प्रकार पाहून नवरगावच्या सरपंच यांनी वनविभाग, तहसीलदार खनिकर्म अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे होत असलेल्या प्रकाराची तक्रार केली. गट क्रमांक 54 मध्ये होत असलेल्या उत्खननाचे सीमांकन करण्यात आले नाही. उत्खननासाठी केल्या जात असलेल्या स्फोटामुळे परिसरातील घरांना तडे जात आहेत. आवाजामुळे जंगलातील वन्य प्राणी गावाकडे येऊन लोकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. नवरगाव ग्रामपंचायत ने ठरावानिसी तक्रार केली असतानाही त्यामुळे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. काम थांबवावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.