ब्रम्हपुरी : तालुक्यातील रणामोचन हे गाव ऐतिहासीक वारसा लाभलेले व संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गाव म्हणून नावारूपास आलेले आहे. नदितिरावर शेतशिवरात गावाच्या उत्तर दिशेला बीचीचंद नावाने ओळखला जाणारा श्रीकृष्ण मंदिर फार पुरातन काळापासून अस्तित्वात आहे. गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून आजही विकासापासून कोसो दूर आहे.
या मंदिराच्या अवतीभवती असलेले चींच व पिंपळाचे विशाल वृक्ष मंदिराच्या अस्तित्वाची साक्ष देतात. विराट राजाच्या काळात याच ठिकाणी रणयुद्ध झाल्याची आख्यायिका आहे. त्या काळाच्या आधीच हे मंदिर अस्तित्वात होते. या ठिकाणी मुख्य प्रवेश द्वाराच्या खुणा दगडी शिल्पात आजही शाबूत आहेत.सदर परिसर निसर्गरम्य ठिकाण असून या ठिकाणी वनभोजन करण्यात येते. सदर मंदिराचा जीर्णोध्दार करून विकासकामे करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.